भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त । भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास केला ॥१॥ जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत । ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥
प्रसिद्ध मुंबई शहरांत । हरीभाऊ नामे विख्यात । आनंदे होते नांदत । निर्वाह करीत नोकरीने ॥३॥
कोकणप्रांती राजापूर । तालुक्यात इटिया गाव सुंदर । हरीभाऊ तेथील राहणार । जात मराठे तयांची ॥४॥
ते खोत त्या गावचे । होते संपन्न पूर्वीचे । त्याच गांवी तयांचे । माता-बंधू राहती ॥५॥
मुंबईत तयांचे मित्र । ब्राह्मण उपनाव पंडित । ते करिता व्यापार त्यात । तोटा आला तयांसी ॥६॥
एके समया पंडितांनी । स्वामीकिर्ती ऐकिली कानी । तेव्हा भाव धरोनी मनी । नवस केला स्वामीते ॥७॥
जरी आठ दिवसांत । मी होईन कर्जमुक्त । तरी दर्शना त्वरीत । अक्कलकोटी येईन ॥८॥
यासी सात दिवस झाले । काही अनुभवा न आले । तो नवल एक वर्तले । ऐका चित्त देउनि ॥९॥
हरीभाऊ आणि त्यांचे मित्र । अफूचा व्यापार करीता त्यात । आपणा नुकसान सत्य । येईल ऐसे वाटले ॥१०॥
त्यांनी काढिली एक युक्ती । बोलावुनी पंडिताप्रती । सर्व वर्तमान त्या सांगती । म्हणती काय करावे ॥११॥
हे नुकसान भरावयासी । द्रव्य नाही आम्हांपासी । फिर्याद होता अब्रुसी । बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥
तेव्हा पंडित बोलले । मलाही कर्ज काही झाले । निघाले माझे दिवाळे । यात संशय असेना ॥१३॥
तुम्ही व्हावया कर्जमुक्त । यासी करावी युक्ती एक । तुमचा होउनी मी मालक । लिहून देतो पेढीवरी ॥१४॥
उभयतांसी ते मानले । तत्काळ तयापरी केले । तो नवल एक वर्तले । ऐका सादर होवोनी ॥१५॥
अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला । हे सांगावया पंडिताला । मारवाडी आला आनंदे ॥१६॥
पंडिते ऐकोन वर्तमान । आनंद झाला त्यालागोन । हरीभाऊते भेटोन । वृत्त निवेदन केले ॥१७॥
अक्कलकोटी स्वामी समर्थ । सांप्रतकाळी वास करीत । त्यांचीच कृपा ही सत्य । कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥ नवस केला तयांसी । जाऊ आता दर्शनासी । वार्ता ऐकुनी उभयतांसी । चमत्कार वाटला ॥१९॥
ज्यांनी आपुले मनोरथ । पूर्ण केले असती सत्य । ऐसे जे का समर्थ । अक्कलकोटी नांदती ॥२०॥
तरी अक्कलकोटाप्रती । येतो तुमच्या सांगाती । आम्ही पाहूनिया स्वामीमूर्ती । जन्म सार्थक करु की ॥२१॥
गजानन हरीभाऊ पंडित । त्रिवर्ग अक्कलकोटी जात । समर्थांचे दर्शन घेत । पूजन करीत भक्तीने ॥२२॥
पाहूनी समर्थांची मूर्ती । तल्लीन हरीभाऊंची वृत्ती । मुख पाहता नयनपाहती । न लवती तयांची ॥२३॥
तेव्हा समर्थ तयांसी । शिव, राम, मारुती ऐसी । नामे दिधली त्रिवर्गासी । आणि मंत्र दिधले ॥२४॥
पंडिता राम म्हटले । गजानना शिवनाम दिधले । मारुती हरीभाऊस म्हटले । तिघे केले एकरुप ॥२५॥
मग समर्थे त्या वेळे । त्रिवर्गा जवळ बोलाविले । तिघांशी तीन श्लोक दिधले । मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥